नाना महाराज तराणेकर | Nana Maharaj Taranekar

जन्म आणि बालपण

नाना महाराजांचे मुळ गाव खानदेशातील घाटनांद्रे हे होते. इ.स १३ /८/ १८९६ श्रावण शुद्ध पंचमी,गुरुवार या दिवशी नानांचा मध्य प्रदेशातील तारणे या गावी जन्म झाला. यथाकाळी या दिव्य बाळाचे बारसे झाले व बाळाचे नाव “मार्तंड” असे ठेवण्यात आले. नानांच्या सात पिढ्या आधीचे मोरभट हे त्यानंतर मध्यप्रदेशातील तराणा या गावी आले व तेथेच स्थायिक झाले. हेच तराणा येथील जोशी ही होते. पू.नानांचे आजोबा आत्माराम शास्त्री हे अतिशय सदाचारी गृहस्थ व आचारसंपन्न गृहस्थ होते.यांना एकूण सहा अपत्ये होती त्यातील तिसर्‍या क्रमांकाचे पुत्र म्हणजे शंकर शास्त्री हे नानांचे पिताश्री होते.ते उत्तम वैदिक,कर्मकांडावर जास्त भर, याज्ञिक व पुराण सहा शास्रांचे अध्ययन झालेले ब्राह्मण होते. वे.शा.संपन्न शंकरशास्त्री तराणा येथे स्वतः ची वेदपाठ शाळा ही चालवत असत. तराणा येथील एक विठ्ठल मंदिर शंकर शास्त्री यांना दानामध्ये लाभले होते. येथील पंढरीनाथांची मनोभावे ते सेवा करित असत.श्री नानांचे वडिल शंकर शास्त्रींना सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांचा अनुग्रह होता. तराणा येथे शंकर शास्त्रींनी इ.स १८८२ मध्ये श्री स्वामी महाराजांच्या हस्ते दत्तमूर्तीची स्थापना केली होती.श्री स्वामी महाराज स्वतः येऊन त्यासाठी तराणा येथे राहिले होते.अशा परमपावन कुळात ज्यावर आधीच श्री थोरल्या स्वामी महाराजांची कृपा होती.

नाना महाराजचे वयाच्या आठव्या वर्षी मौंजीबंधन झाले.नाना चौथी पर्यंत शाळेतील शिक्षण ही शिकले पण एक प्रसंग घडला व ते परत शाळेत गेले नाही. सन १९०४ साली श्री थोरले स्वामी महाराज हे पुन्हा एकदा तराणा येथे मुक्कामी आले. त्यावेळी ते बाळ मार्तंडाला आपल्या जवळ बसवून घेत,त्याला आपल्या बरोबर नदीवर स्नानासाठी घेऊन जात ,तसेच त्याला आपल्या हाताने प्रसाद देत. जणू यातूनच ते आपल्या या शिष्यावर कृपा अनुग्रह करत होते. पुढे नाना वेदांच्या पुढील अध्ययनासाठी इंदूर च्या नरहर शास्त्रींच्या वेदपाठशाळेत गेले.श्री टेंब्ये स्वामी महाराजांचे शिष्य इंदूर चे तांबे स्वामी हे नानांचे सहाध्यायी होते. वयाच्या अकराव्या वर्षी नानांना सद्गुरु प्राप्तीची विलक्षण ओढ लागली. त्यांनी आपल्या वडिलांना आपल्याला अनुग्रह देण्याची विनंती केली पण शंकर शास्त्रींनी “मी तुझा गुरु नाही,मी इतरांना अनुग्रह देऊ शकतो पण दत्तप्रभु़ची तुला अनुग्रह देण्याची मला आज्ञा नाही.” त्यांनी नानांना गुरु प्राप्ती साठी गुरुचरित्राचे सप्ताह करण्याची आज्ञा केली.अकरा वर्षाच्या नानांनी लागोपाठ सहा सप्ताह पूर्ण केले व सातव्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी प्रत्यक्ष श्री प. पू. वासुदेवानंद टेंबे स्वामी महाराज ब्रह्मावर्ताहून चार्तुमासात व्यग्र असतानाही वायुवेगाने येऊन बाळ मार्तंडला अनुग्रह दिला. ‘तू दत्ताचे लाडके लेकरू, समाधीत न रमता, दत्तभक्तांना सुलभ सोपा मार्ग दाखवून जनजागृतीचे मोठे काम तुला करावयाचे आहे, असे सांगून अंतर्धान पावले. त्यापूर्वी आपली छाटी पांघरून व चैतन्यमयी मंत्राक्षरे नानांच्या कानात सांगितली. तो गुरुमंत्राचा दिवस होता मंगळवार त्रिपुरारी पौर्णिमा (कार्तिक शु. पौर्णिमा), दि. २२-११-१९०४ अनुग्रह दिला. प. पू. वासुदेवानंद टेंबे स्वामी महाराज ब्रह्मावर्ताहून चार्तुमासात व्यग्र असतानाही वायुवेगाने येऊन बाळ मार्तंडला अनुग्रह दिला. ‘तू दत्ताचे लाडके लेकरू, समाधीत न रमता, दत्तभक्तांना सुलभ सोपा मार्ग दाखवून जनजागृतीचे मोठे काम तुला करावयाचे आहे, असे सांगून अंतर्धान पावले. त्यापूर्वी आपली छाटी पांघरून व चैतन्यमयी मंत्राक्षरे नानांच्या कानात सांगितली. तो गुरुमंत्राचा दिवस होता मंगळवार त्रिपुरारी पौर्णिमा (कार्तिक शु. पौर्णिमा), दि. २२-११-१९०४ अनुग्रह दिला. देताक्षणीच नाना गाढ समाधीत .श्री थोरल्या महाराजांनी बाळ नानांचे या समाधी तून उत्थान केले व आपल्याला आता मोठे दत्त कार्य करायचे आहे असा उपदेश केला.

नानांच्या वयाची अठरा वर्षं पूर्ण होताच शंकर शास्त्रींनी इंदूर येथील शंकरराव डाकवाले यांची कन्या भिमाबाई यांच्याशी नानांचा विवाह लावून दिला. भिमाबाईंचे सासरी म्हाळसा हे नाव ठेवण्यात आले. पुढे नानांना एक मुलगा झाला त्याचे नाव शंकर असे ठेवण्यात आले. लवकरच नानांच्या पत्नी म्हाळसा बाई यांचे निधन झाले . या अवघड परिस्थितीत नाना आपल्या धाकट्या भावंडांचे शिक्षण करत होते,मुलाला सांभाळत होते, मंदिरातील पूजा, घरातील व्यवस्था ,यजमानांच्या पूजा अशा चौफेर जबाबदारी पार पाडत होते. नातेवाईक व आप्तांनी लहान मुलाकरीता तरी लग्न कर असा नानांना आग्रह केला व लहान‌ शंकरासाठी नानांनी १९२४ ला दुसरे लग्न केले. या दुसर्‍या पत्नीचे नाव ही म्हाळसा असेच ठेवण्यात आले. यांना पुढे एक मुलगी झाली व नानांचा संसार पुन्हा आनंदात सुरु झाला. तराण्यातील दत्त मंदिरातील सर्व पूजा व सेवेचे नियम हे गाणगापूर येथील मंदिरानुसार नाना करित असत. पुढे नानांच्या दुसर्‍या पत्नीचे ही अचानक निधन झाले व नानांचा संसार संपुष्टात आला. सद्गुरु माउलींची इच्छा असे समजून नाना शांत होते.

कार्य आणि तिर्थयात्रा

अचानक एके दिवशी दत्तप्रभुंनी नानांना तिर्थयात्रा करण्याची आज्ञा केली आणि मग नाना माउलींच्या जिवन चरित्रातील एक सुवर्ण यात्रा भाग सुरु झाला.नानांनी आपले दोन्ही लेकरं आपली चुलत बहिण कोंडुताईंच्या हवाली केली व नानांनी तीर्थयात्रेस निघाले. नानांची पहिल तिर्थयात्रा होती ती म्हणजे काशी ची.गुरुचरित्रात वर्णन केल्याप्रमाणे नानांनी संपूर्ण काशी‌ यात्रा शास्त्रशुद्ध पद्धतीने केली.त्यावेळी नानांना शिवदर्शनाची विलक्षण ओढ लागली.तेव्हा एका निर्जन स्थळी नाना मंत्र जप करत निर्वाण मांडून बसले.तेव्हा भगवान आशुतोष महादेवांनी नानांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन कृतार्थ केले होते. असेच नाना पुढे नाना मथुरेच्या , वृंदावनाच्या यात्रेला गेले असता कृष्ण स्मरणाने व्याकुळ झाले.नाना भगवंतांच्या विरहात बेभान झाले व देवांच्या दर्शनास आतुर झाले.नानांनी देव दर्शन देत नाही मग जगून काय फायदा म्हणून यमुनेत प्राण त्याग करण्याचा विचार केला.नानांची निष्ठा आणि अनन्य भाव बघून भक्तवत्सल भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभु आपल्या दिव्य सुकुमार बाल गोपाल रुपात प्रगट झाले.नानांशी थोडे बोलून देवांनी नानांच्या हातावर आपल्या झारीतील तिर्थ घातले व नानांना प्रगाढ समाधी लागली.असे सुंदर गोपाल कृष्णाचे ही दर्शन नानांना झाले होते.

श्री थोरल्या स्वामी महाराजांनी नानांना नर्मदा परिक्रमा यम नियमांसह करण्याची आज्ञा केली. पुज्य तराणेकर महाराज नर्मदा मैय्याची परीक्रमा करतांना जंगलात सुर्यास्त झाला. ते तिथेच मुक्कामी थांबले.जंगल सुध्दा वनस्पती व जंगली श्वापदांच्या आधीवासाने संमृध्द होत. नाना महाराज नर्मदा मैय्याच्या नामस्मरणात तल्लीन होते. त्या रात्री चंद्रोदय झाल्यावर मैय्या पात्रातून प्रत्यक्ष नर्मदा मैय्या हातात अमृतासमान दुधाचा सुवर्ण कलश हाती घेऊन अवतरली. त्यांनी नानांना आग्रहपूर्वक तो कलश हाती सुपूर्द केला व हे ग्रहण करा असे म्हणून शांतपणे उभी ठाकली. नर्मदे हर, नर्मदे हर म्हणतच नानांनी तो कलश तोंडाला लावला क्षुधाशांती होवून, प्रसन्न पणे त्यांनी तो हाती घेतलेला रीता गडवा देण्याआधी धुवायच्या हेतूने उठले तो ईतक्या वेळ शांत उभी ठाकलेली नर्मदा मैय्या क्षणार्धात अदृष्य झाली. पुज्य नाना काही क्षण भावविभोर झाले आणि भानावर येता क्षणी आता हा सुवर्ण कलश (गडवा) परत द्यावा कुणाला? ह्या विचाराने थोडे अस्वस्थ झाले पण दुसऱ्याच क्षणी नर्मदा मैय्याने त्यांच्या हाती सुपूर्त केलेला तो सुवर्ण कलश परत नर्मदा मैय्याच्या पात्रात तिचा तिला म्हणून साष्टांग नमन करुन परतही केला.

एका यात्रेत नाना हिमालय, केदारनाथ ,बद्रिनाथांच्या दर्शनास गेले होते. पर्वतातून फिरत असता नाना गुरुकृपेने रस्ता चुकले‌ व एका भव्य गुंफेपुढे येऊन पोचले. त्या गुफेत आत गेले असता त्यांना महाभारत काळातील एका योग्याचे दर्शन ,भेट व मार्गदर्शन लाभले होते.हा योगी महाभारतातील एक सैनिक होता व भगवान श्रीकृष्णांनी त्याला हिमालयात योग साधना करण्याची आज्ञा केली होती त्यामुळे तो तिथे वास्तव्यास होता.नानांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली हा संवाद जवळपास तीन दिवस अखंड सुरु होता.हा प्रसंग अतिशय दिव्य आणि अलौकिक आहे. एकदा गिरणारी दत्त दर्शनाला गेले असता ,नानांना दत्त शिखराच्या ही वरती गुप्त स्थानी असलेल्या नवनाथांच्या साधनेची जागा बघायची होती. तेव्हा प्रत्यक्ष दत्त प्रभुंनी गुराख्याचे रुप घेऊन नानांना त्या स्थानापर्यंत नेले होते. तसेच नाना जवळपास सन १९६१ पर्यंत आपल्या सद्गुरु माउली श्री टेंब्ये स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाला दर वर्षी न चुकता जात असत. तसेच उत्तर आयुष्यात नाना आपल्या भक्तांसह एकदा अनसुयामातेच्या  क्षेत्राची यात्रा करण्यास गेले होते तेव्हा प्रत्यक्ष भगवती अनसुया मातोश्रींनी नानांना दर्शन दिले होते. अशा अनेक विलक्षण यात्रा केल्या नंतर नानांना दत्त क्षेत्राला जाऊन काहितरी अनुष्ठान करावे असे सतत वाटत असे.नानांनी गाणगापूर येथे ५१ गुरुचरित्राचे पारायण करण्याचा संकल्प केला व ते गाणगापूर येथे गेले. यथावकाश गाणगापूर ला राहून नानांनी ५१ पारायण पूर्ण केले.नानांचा मुक्काम गाणगापूरी होता व गुरुप्रतिपदेचा उत्सव जवळ‌ आला. या उत्सवात गाणगापूर ला यति पूजनाचा सोहळा पार पडला जातो. त्यावेळी संन्यासी जनांचे पाद्य पूजन करतात. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी पुजार्‍याला दृष्टांत दिला आणि सांगितले की या या ठिकाणी मार्तंड तराणेकर नामक व्यक्ती मुक्काम करुन आहेत, त्यांना मठात बोलावून त्यांची पाद्यपूजा यति पूजन करावे. त्या वर्षी गृहस्थाश्रमी नानांचे गाणगापूर येथे यति पूजन झाले होते. तसेच ग्वाल्हेर कडे अवधूत वृत्तीत फिरत असता नानांना एका राम मंदिरात प्रत्यक्ष भगवान रामरायांचे व लक्ष्मणजींचे दर्शन झाले होते.

त्यांचे आवडते स्थान  श्री क्षेत्र गाणगापूर. येथील संगमाच्या समोरच १९८३-८४ साली स्वत:च्या देखरेखीखाली मोठी धर्मशाळा बांधली. त्या काळात भक्तांना संगमावर पारायण व इतर साधना करण्यासाठी शांत असे ठिकाण नव्हते. हे पाहून परमपूज्य नाना महाराजांनी भक्तांसाठी ‘साधना भवन’ ही वास्तू निर्माण केली. सन १९८४ साली प. पू. नारायण महाराज यांचे यतीपूजन झाले. प. पू. नारायण महाराजांनी त्यांच्या जीवनात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांतील विविध ठिकाणी ३२ मोठे यज्ञ केले. एका विष्णू याग यज्ञ प्रसंगी नाना एका खेड्यात गेले होते.तेथे विस्तव मिळाला नाही व यज्ञाचा मुहूर्त ही टळून चालला होता तेव्हा सर्व लोकांपुढे नानांनी समीधेवर फक्त आपली दृष्टी टाकली आणि यज्ञ प्रज्वलित केला होता. हा प्रसंग अनेक लोकांनी बघितला होता.

नानांना अनेक संतांचा सहवास लाभला होता.धार मध्यप्रदेश येथील नित्यानंद महाराज हे नानांना भेटायला‌ येऊन गेले होते.तसेच बडे दादाजी धुनीवाले यांचा तर नानांवर विशेष स्नेह होता.पुण्याचे सद्गुरु श्री गुळवणी महाराज व नानांचा हृद्य संबंध होता.वज्रेश्वरीचे नित्यानंद महाराज,नाशिकचे गणेशबाबा,नारेश्वरचे रंगावधूत महाराज,नागपूरचे बापुमहाराज खातखेडकर,देवासचे शीलनाथ,इंदूर चे माधवनाथ,मामा साहेब दांडेकर,धुंडा महाराज देगलूरकर या सर्वांचे नानांशी अतिशय प्रेमाचे नाते होते.या सर्व संत मंडळी व नाना अनेकदा भेटले होते.एकदा त्यांचा येथील दत्त जन्माच्या उत्सवात तूप कमी पडले.सर्वत्र पाने मांडली गेली ,लोक जेवायला बसले.सर्वजन गोंधळात सापडले.तेव्हा नानांनी नदीतील पाणी घागरीत भरुन आणण्यास सांगितले.तसे केल्या क्षणी ते पाणी तुपात रुपांतरीत झाले होते.उत्सव झाल्यावर नानांनी तेवढ्याच घागरी तूप नदीत सोडण्याची आज्ञा भक्तांना केली होती. पुढे नाना तराणा सोडून इंदूर येथे राहण्यास गेले.सुरवातीच्या काळात ते भाड्याच्या घरात राहत असत.नंतर त्यांनी‌ आपल्या नुतन वास्तुत प्रवेश केला.इंदूर येथे नानांनी अनेक लिला चमत्कार केले,अनेक भक्तांना अनुग्रह देऊन कृतार्थ केले.नानांचा अनेक ठिकाणि मुक्काम व दौरा होत असे.मुंबई, पुणे ,नाशिक अशा विविध ठिकाणी नानां भक्तांसाठी जात असत.नानांचा नावलौकिक व प्रभाव इतका प्रचंड होता की नाना जिथे ही जात तिथे त्यांच्या दर्शनाला हजारो भक्तांची रांग लागत असे.नानांच्या कृपा करुणेच्या हकीकती आजही अनेक ग्रंथांतून शब्द बद्ध केल्या आहेत.त्यांचा उल्लेख जरी केला तरी अनेक लेख लिहावे लागतील.पू.नानांनी घराघरात त्रिपदी व दत्त उपासना पोचवली. अनेकांना सन्मार्गाला लावले ,अनेकांचे दु:ख दूर केले.नानांनी हेच तेज आपल्या शिष्यात ही समाविष्ट केले.खामगावचे आगाशे काका, वाशिम चे पंडित काका धनागरे ,भुसावळचे पेटकर काका हे नानांचे मुख्य शिष्य.या शिष्यांनी ही नानांच्या नावाची पताका व दत्त भक्ती चे‌,दत्त संप्रदायाचे भक्त कार्य भविष्यात केले.अशा या दत्त संप्रदायातील थोर विभूतींनी शुक्रवार दिनांक १६/४/१९९३ चैत्र वद्य दशमी या दिवशी आपला देह दत्त चरणी लिन केला .

श्री नानांची अमृतवाणी

सेवकाने आपला पाया पक्का केला की सद्गुरूंची शोभा वाढत असते.

सद्गुरूंच्या आचरणाकडे लक्ष न ठेवता त्यांच्या चरणाकडे ठेवा.

प्रपंचातच अतिथीव्रत राहता आले की परमार्थ तेथेच साध्य आहे.

संत व सद्गुरु यांच्या प्रत्येक शब्दाला, कृतीला अर्थ असतो. म्हणुन नुसते त्यांचेजवळ बसले तरी लाभ.
जो सद्गुरूंना ओळखु शकत नाही तो देवाला काय ओळखणार ?
नुसते नामस्मरण करणे म्हणजे प्रार्थना. या प्रार्थनेने भगवंत भेटेलही पण वेळ लागतो आणि स्वतःच्या बळावरच प्रवास करावा लागत असतो, पण तेच नाम जर गुरुमुख झाले तर त्या पाठीमागे श्रध्दा, विश्वास यांचा आधार, शिवाय गुरुचे पाठबळ राहते मग इच्छित लवकर साध्य होते. नुसत्या नामस्मरणाने भगवंत भेटला तरी तोच सांगतो – ” हे बघ अमुक ठिकाणी जाउन त्यांना शरण जा व त्यांचेकडून नाम घे ” असा आहे गुरुमुख नामाचा महीमा.
उपासनेमध्ये श्रध्देला प्रथम महत्व. नुसता निश्चय टीकून राहणे कठीण. श्रध्दा पाहिजे.  मग ती अंधश्रध्दा असली तरी चालेल. त्यानेच निश्चय टिकत असतो.
आमच्याकडे नाना लक्ष ठेवा, असे आम्हाला सांगून काय फायदा ? तुमचे लक्षच आमचेकडे लागले की आमचे लक्ष तुमच्याकडे वेधणारच.
आमचे शक्तिने आम्ही आमचे स्वतःचे व तुमचे भोग दाबून टाकू शकतो. पण पुढे तरी ते भोगावेच लागणार त्यापेक्षा याच जन्मी ते भोगून टाकणे योग्य असते म्हणून आम्ही ते दाबत नाही. पण एक गोष्ट करतो की भोग भोगताना भोगणाऱ्याचे चित्त आम्ही प्रसन्न ठेवत असतो.
तुम्हाला भूक लागली की, तुम्ही जेवायला बसता किंवा खाता त्यावेळी तुम्ही आम्हाला रोज विचारायला येत नाही मग ” नाना ! आमची उपासना कमी पडते, जप जास्त होत नाही ” हेच विचारायला का येता याचे आश्चर्य वाटते. जेवण जितके अंगवळणी पडले आहे तितकी उपासना अंगवळणी पडली पाहिजे. त्यात अडचण आली तर आम्हाला न बोलावता आम्ही येऊन निराकरण करत असतो.
थंडीचे दिवसात थंडी तिचे काम करते. नको पडू म्हटले तरी ती पडतेच त्याचप्रमाणे उपासना ही कोणत्याही कारणास्तव खंडीत होऊच शकत नाही. आपण ती जाणूनबुजुन करतो.
भाड्याचे घरात रहात आहात तर तुम्हाला दरमहा घरभाडे द्यावेच लागते. भले तुम्ही बाहेरगावी गेलात तरी ठरलेले भाडे एकदम भरावेच लागते. भाडे भरले नाही तर मालक नोटीस देतो, त्याचप्रमाणे देह धारण केला आहे तर त्याचेही भाडे तुम्हाला भरावेच लागेल. देवऋण, पितृऋण, ऋषीऋण, हे भाडे भरले तर ठीक नाहीतर चोरी, आजारपण, अपघात, बेकारी हे आघात सोसावे लागता
सराफाचे दुकानात दागिने विकत घ्यायला खूप गिऱ्हाईके येतात. निरनिराळ्या प्रकारचे दागिने विकले जातात. विकत घेणारा म्हणतो मी अमुक अमुक दागिने घेतले पण सराफ दागिने किती  विकले हे न पाहता सोने किती विकले गेले (दागिन्याचे रुपात) हेच पाहतो. विश्व पसाऱ्याकडे पाहण्याची आपली तशी दृष्टि पाहिजे.
Please Follow US & Like Me

Leave a Comment